Monday, January 11, 2010

सवाई गंधर्व महोत्सव २०१०

गेली ५७ वर्ष अखंड चालू असणारा सवाई गंधर्व महोत्सव या वर्षी ७-१० जानेवारी या कालावधीत रमण बाग प्रशाळेच्या प्रांगणत रंगला होता. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संकल्पनेतून आणि आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्या सहयोगातून स्थापन झालेल्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी आजवर हजेरी लावली आहे.
महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असा गौरव असणार्या पुणे शहराचा हा मानबिंदू असणार्‍या या महोत्सवाचा आनंद लुटण्याची अनेक वर्षाची इच्छा ८ तारखेला पूर्ण झाली. महोत्सवाच्या दुसर्‍या सत्रास जायचे असे माझे आणि मित्राचे ठरले. कचेरीतून gate -pass घेऊन लवकर निघता यावे म्हणून सकाळी लवकर उठून वेळेच्या आधीच कचेरीत पोहोचलो.खरे कारण संगितल्याने आणि सर सुद्धा संगीताचे चाहते असल्याने काहीही खळखळ न करता त्यांनी लवकर निघण्याची परवानगी दिली. सहसा वेळेवर न येणारा मित्र केवळ या महोत्सवाच्या निमित्ताने माझया कचेरीत वेळेवर आला. आणि आमची स्वारी कार्यक्रमाच्या ठिकाणी ४ च्या आधी अर्धा तास दाखल झाली.
शुक्रवार,८ जानेवारी २०१०,सायंकाळी ४ वाजत रु.१०० ची प्रवेशिका घेऊन आम्ही भारतीय बैठक घालून स्थानापन्न झालो. 'जिथे कमी तिथे आम्ही' या उक्ती नुसार गर्दी कमी असणार्‍या परंतू कार्यक्रम व्यवस्थित दिसणार्‍या जागेची निवड आम्ही केली होती. रसिक आणि चोखंदळ पुणेकरांनी चटई, सतरंजी,पिशवी पसरून स्वतःची जागा आरक्षित केली होती. निमंत्रितांसाठी राखीव ,सोफा सेट , खुर्ची ,भारतीय बैठक अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सलग ६-७ तास असणार्या कार्यक्रमाचा श्रोत्यांना त्रास होऊ नये म्हणून मंडपाबाहेर खाद्यपदार्थांच्या छोटी दुकाने, स्वच्छता गृहे (उत्तम स्थितीत असणार्या आणि दुर्गंधी मुक्त) यांची व्यवस्था संयोजकांनी उत्तम प्रकारे केली होती. दर्जेदार ध्वनी क्षेपक यंत्रणा आणि कार्यक्रमाचे अगदी मंडपाच्या शेवटपर्यंत प्रसारण होईल असे क्लोज़ सर्किट दूरदर्शन संच योग्या ठिकाणी लावण्यात आले होते.

नियोजित वेळेप्रमाणे ठीक ४ वाजता सूत्रसंचालकांनी ध्वनी प्रक्षेपकचा ताबा घेतला. भारदस्त आवाज लाभलेल्या सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाची रूप रेषा थोडक्यात पण महत्वाच्या गोष्टीनी स्पष्ट केली. आणि ४:१५ सुमारास पंडित राजेंद्र कान्दल्गावकर यांनी त्यांच्या गायकीला प्रारंभ केला. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीचे पहिले पुष्प पंडित -कान्दल्गावकर यांनीआपल्या कमावलेल्या गायकीने रसिकांसमोर पेश केले. मला स्वतःला शास्त्रीय संगीताची फारशी जाण नसतांनाही मी त्या संगीत मैफीलीत मुग्ध झालो , आणि शास्त्रीय संगीताच्या ताकदीची मला नव्याने जाणीव झाली. पंडित कान्दल्गावकरानी राग मुल्तानी आळवायला सुरूवात केली , आणि कार्यक्रम दर्जेदार होणार याची खात्री पटली. स्वर आणि ताल यांवर जबरदस्त हुकुमत, योग्य दमसास आणि अभिजात गायकी यांचा मिलाफ पंडितांच्या गायकीत अनुभवायला मिळाला. साधारण सव्वा तास चाललेल्या त्यांच्या गायकीला पुणेकर रसिकांची दाद मिळाली ती २-३ मिनिट गर्जणार्‍या टाळ्यांची.

त्यानंतरचे दुसरे पुष्प ओवले ते खुद्द पंडित भीमसेन जोशींचे सुपुत्र म्हणजेच श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी. पित्याच्या किराणा घराण्याचा वारसा तितक्याच ताकदीने चालवणार्या या गायकला श्रोतृ वृंदाने अनेकवेळा दाद दिली. याच वेळेस जोशींच्या तिसर्‍या पिढीतील उभारता तारा विराज श्रीनिवास जोशी वय वर्ष साधारण ५-६ याने सक्रिय साथ दिली. प्रोत्सहन्पर म्हणून त्याला कुणी एका दर्दि व्यक्तीने रु. १००१ ची भेट बहाल केली. याच भागात पंडित श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी शेवटच्या २५ मिनिटांत पंडित भीमसेन जोशींवर आधारित प्रत्येकी ५ मिनिटांच्या ४ बंदिशी सादर केल्या. त्यात ख्यातनाम व्यक्तींना पंडित भीमसेन जोशींचे झालेले दर्शन, पंडित भीमसेन जोशींचा अबोल स्वभाव, त्यांनी लहानपणापासून आजवर कलेचा साधक म्हणून केलेला प्रवास याचा समावेश केला होता. माझ्या सारख्या नवख्या आणि हौष्या लोकांना नेमक काय चालल आहे हे समजावे म्हणून पंडित श्रीनिवास जोशी यांनी या बंदिशी तपशीलवार उलगडून दाखविल्या. माऊली टाकळकर या टाळ वादकाची विनंती नाकारणे किती अवघड आहे याचे प्रत्यंतर त्यांनी टाळ वाजवाल्यानंतर आले. (मी जो टाळ गणपतीत वाजावतो त्याला टाळ कूटणे म्हणतात याची जाणीव मला झाली.)अवीट गोडीच्या 'माझे माहेर पंढारी' हा अभंग त्यांनी टाळ श्रीनिवास जोशी यांच्या कडून गाऊन घेतला.
पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना तबल्यावर साथ करणार आहेत श्री. घाटे आणि मृदुंगवादाक आहेत पंडित भवानीशंकर अशी अगदी आयत्या वेळी जाहीर झाले आणि रसिकांच्या आनंदला परावर उरला नाही. भगवान श्री कृष्णाच्या बासरी वादना नंतर लोकांना मोहित करण्याचे सामर्थ्य कुणाच्या बासरीवादनात असेल तर ते म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासिया. त्याची अनुभूती 'याची देही याची डोळा' अनुभवायला मिळाली. त्यांनी घातलेली पहिली फुंकरच रसिक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. पहिली २० मिनिटे केवळ बासरीचे सूर मंडपात गुंजत असताना पंडित भवानीशंकर यांनी मृदुंगावर थाप मारली आणि दर्दि रसिकांच्या गर्दीचा नुरच पालटला. त्यांच्या जुगलबंदीला अनेकवेळेला टाळ्यांची दाद मिळाली. त्यानंतर घाटे यांचे तबला वादन आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी याने मंडपचे वातावरण भरून गेले. सलग सव्वा तास बासरी वादन करूनही त्यांच्यावर थकव्यचा परिणाम जाणवून येत नव्हता. प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन त्यानी नंतर 'दुर्गा ' राग सादर केला. आणि संपूर्ण श्रोतृवृंदाची ब्रह्मानंद टाळी लागली. यात तीन ही कलाकारांनी एकमेकांवर कुरघोडी न करता कला सादर केली. आणि प्रेक्षक मायबापांना स्वर्गीय सुखात न्हाऊ घातले. कार्यक्रमाच्या शेवटी पंडित हरिप्रसाद चौरासियांच्या हस्ते एका सीडी चे अनावरण झाले.
पंडिता मालिनी राजूरकर यांनी त्या दिवशीचे चौथे आणि अंतिम पुष्प त्यांच्या गायाकीने गुन्फले. स्वर्गीय सुखाची अनुभूतीआणि अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय याचा प्रत्ययकारी अनुभव त्यादिवशी मी आणि माझ्या मित्राने अनुभवले. दुचाकीवरुन रात्री घरी जाताना आमची वेगळीच अवस्था झाली होती . घाईगर्दी ,हेवेदावे यातून आम्ही दूर फेकल्यासारखे झालो होतो. आपसूकच मौनव्रत आमच्याकडून धारण झाले होते.
शास्त्रीय संगीतातून आम्हाला चार क्षण सुखाचे, आनाडाचे देणार्या सर्व महान कलावंतांना हा ब्लॉग अर्पण.

(ता.. क.- कार्यक्रम स्ंपल्यानंतर कुणी तरी म्हणले पैसे वसूल, वाईट एकाच गोष्टीच वाटत की असे स्वर्गीय सुख सुधा या मतलबी जगात लोक पैशात मोजतत. असो!)